तुम्ही
सत्यजीत रे यांचा (किमान माझ्यासाठी) सर्वोत्कृष्ट चित्रपट 'चारुलता' ,
१९६४ पहिला आहे का (जलसा घर, पथेर पांचाली, शतरंज के खिलाडी, आणि इतर
त्यांचे अनेक त्या नंतर येतात)?
त्यात एक प्रसंग दाखवला आहे चारुलता मोठ्या बागेत झोक्यात बसली आहे आणि तिचा धाकटा दीर अमल शेजारी जमिनीवर पहुडला आहे ...
रेंचे
वैशिष्ट्य म्हणजे ते कॅमेरा चारुलता कडून अमल वर रोखतात आणि अमल कडून
चारुलता कडे... बहुतेक सर्व हिंदी सिनेमातील झोपाळ्यावरच्या उत्तम गाण्यांत
(जसे 'सुनो सजना पपीहे ने') तुम्हाला फक्त अमलकडून चारुलताकडे रोखला
गेलेला कॅमेरा दिसेल ...
ह्या
सगळ्यातून आपल्याला जास्त तीव्रतेने जाणवते की चारुलता चे मन अमल बाबत
अतिशय दोलायमान झाले आहे ... काय वाटतय तिला नेमके त्याच्या बद्दल?
मी ते तुम्हाला सांगणार नाहीये. तुम्ही चित्रपट पहा आणि तो सीन युट्युब वर इथे पहा https://www.youtube.com/watch?v=EcUHbTBElO0
दीनानाथ
दलाल यांनी १९५१ च्या दीपावली च्या दिवाळी विशेषांकात रंगवलेला राग हिंदोल
हाच तो क्षण पकडतो —मनाच्या झुल्यावर बसलेली स्त्री, स्वतःच्या भावनांच्या
तालावर झुलते आहे.
तिच्या
झोक्याचा ठाव घेताच वाऱ्याने केस उडतात, साडीचा पल्लु हलतो, आणि झाडांच्या
सावल्यांतून प्रकाशाचे ठिपके तिच्या देहावर पडतात. ती कोणाची वाट बघतेय का?
की स्वतःच्याच मनात झुलतेय? हा प्रश्न चारुलतेसारखाच आहे — अमल आहे की
केवळ वसंताचा झोका?
राग हिंदोलच्या
संगीतस्वरूपातही हेच आहे —त्याचे स्वर झोक्यात झुलतात: “सा म ध नी, सा म ध
नी…” ना विरह, ना मिलन — फक्त ओढ, लय आणि हलकीशी मादक अनिश्चितता. दलाल
यांनी तीच धुंद नाजुकता रंगात पकडली आहे.
चारुलता झोपाळ्यावर रवींद्रनाथांचे रवींद्र संगीतातील हे गाणे गुणगुणते आहे :
"फुले फुले ढोले ढोले,
बोहे किबा मृदु बाए।
टोटिनी हिलोलो तुले,
कोल्लोले चोलिया जाय।
पिको किबा कुन्जे कुन्जे,
पिको किबा कुन्जे कुन्जे,
कुहू कुहु कुहू गाय।
की जानि किशेरो लागी,
प्राणो कोरे हाय-हाय।
( मराठी अनुवाद
फुलांवर हलके-हलके,
मंद वारा वाहतो.
नदी किंचित लाटा निर्माण करून,
छान आवाजाने पुढे वाहते.
कोकीळ बागेमध्ये,
कुहू-कुहू-कुहू गात आहे.
माहीत नाही कशासाठी,
माझा जीव व्याकूळ झाला आहे. )
दलाल
यांच्या हिंदोल मध्ये हीच चारुलतेची स्थिती आहे —नायिकेच्या अंगभूत
सौंदर्यात एक लय आहे, आणि त्या लयीमध्ये एक अवघड जाणिव: “माहीत नाही कशासाठी, माझा जीव व्याकूळ झाला आहे”
हीच
तर हिंदोलाची जादू आहे —संगीत, रंग, आणि मन — सगळं एकाच झुल्यावर झुलतं.
तो कल्याण थाटातील एक राग आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात तीव्र
(तीव) मध्यम स्वर असतो आणि गंधार व निषाद हे स्वर कोमल असतात. या रागाचे
नाव झुल्यावरून (हिंडोला) आले आहे, कारण त्याची चाल झुल्याप्रमाणे असते,
जसे की म आणि ध या स्वरांचा वापर करून झोक्यासारखी लय तयार होते.
रंगसंगतीकडे
पाहिलं, तर —हिरव्या झाडांच्या सावलीत नायिकेचं पिवळं लुगडं जणू सूर्याचा
किरण आहे. तिच्या मागे जांभळट, गुलाबी आकाश — दिवस आणि संध्याकाळ यांच्या
मधला क्षण — ज्यात हिंदोलाचा स्वर झोके घेतो: ना पूर्ण तेज, ना पूर्ण गूढता
— फक्त लय आणि हलकेपणा.
राग दीपक’
जसा देहाचा ताप दाखवतो, तसा ‘राग हिंदोल’ मनाचा झोका दाखवतो. दलाल यांनी
इथे स्त्रीला वसंताच्या मुक्त, निःसंकोच क्षणात पकडलं आहे —ती कोणासाठी झुलते आहे, हे महत्त्वाचं नाही; महत्त्वाचं म्हणजे — ती झुलते आहे, आणि झुलतानाच ती स्वर होते आहे...
की जानि किशेरो लागी, प्राणो कोरे हाय-हाय।
कलाकार: दीनानाथ दलाल, दलाल आर्ट स्टुडिओ
सौजन्य व आभार: महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था, चित्रकार दीनानाथ दलाल मेमोरियल समिती, दलाल परिवार
(चित्र क्लिक करून मोठ्या स्क्रीनवर अवश्य पाहा.)
