सई परांजपे , लोकसत्ता, जानेवारी २०१४:
"... शकुंतला परांजपे हे नाव ती लेखिका असल्यामुळे परिचित असले तरी माझ्या मते तिची खरी ओळख तिने संततिनियमनाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे नोंदवली जावी. रघुनाथ धोंडो कर्वे हे आईचे दूरचे चुलतभाऊ. (अप्पा आणि भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे हे सख्खे आते-मामेभाऊ!) पण नाते जरी दोन चुलींपलीकडचे होते, तरी कर्वे-परांजपे जवळीक दाट होती. कर्वे तेव्हा समाजात संततिप्रतिबंधाचा प्रचार करण्याच्या प्रयत्नांत होते. पण ते बरेचसे अरण्यरुदन होते. कारण तो विषयच तेव्हा अप्रिय होता. तेव्हा कुणी त्यांचा उपदेश आचरण्याचे तर सोडाच; पण ऐकण्याच्याही मन:स्थितीत नव्हते. एकदा ते आईला म्हणाले, ‘‘या कामाचा खरं तर स्त्रियांच्यात प्रचार व्हायला हवा. पण त्यासाठी एखादी खंबीर बाई उभी राहिली पाहिजे. तू करशील का हे काम?’’
‘‘अप्पांना विचारून सांगते,’’ असे तिने उत्तर दिले. अप्पांनी तात्काळ संमती दिली. म्हणाले, ‘‘हे कार्य अतिशय निकडीचे आहे. प्रजा अशीच बेसुमार वाढत राहिली तर देशात फार कठीण परिस्थिती ओढवणार आहे.’’ मग आईने या खडतर कार्याचा श्रीगणेशा केला. अर्थात् मार्गदर्शक आणि गुरू र. धों. कर्वे होते. .."
वाङ्मय शोभा, ऑगस्ट १९५१
