इतिहास आपल्याला सहसा पाठ्यपुस्तकांतून भेटतो — युद्धांच्या आणि राजकीय घटनांच्या रूपाने.
पण कधी कधी तो आपल्या आयुष्यात अगदी साध्या गोष्टीतून प्रवेश करतो — जसे की एखाद्या गर्दीच्या बसच्या प्रवासातून.
१९७० चे दशक आमच्या सारख्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खडबडीत होते. तेलाच्या किमतीचा भडका, रॉकेलचे अचानक बाजारातून गायब होणे — अशा घटना त्या काळच्या दैनंदिन आयुष्याचाच भाग होत्या.
१९७० चे दशक आमच्या सारख्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी किती खडबडीत होते याची काही उदाहरणे मी या ब्लॉगवर आधी लिहिली आहेत. तेलाच्या किमतीचा भडका, रॉकेलचे अचानक बाजारातून गायब होणे — अशा घटना अजूनही आठवतात.
आज आणखी एक आठवण.
१९७१ चे युद्ध झाले आणि त्यानंतर देशात महागाईची जोरदार लाट आली. त्यावर १९७३ चा तेलाचा झटका. आम्ही थोडेफार सावरत होतो, पण परिस्थिती अजूनही अस्थिरच होती.
माझ्या वडलांना त्या काळात प्राध्यापकीची स्थायी नोकरी नव्हती. सांगलीत जी नोकरी होती ती १९७२–७३ शैक्षणिक वर्ष संपता संपली. त्यामागे काही कारणे होती — त्यात त्यांचीही काही चूक होती — पण ती कथा कधीतरी वेगळी.
सुदैवाने जून १९७४ पासून त्यांना नाशिकच्या KTHM कॉलेजमध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळे घरातला मूड थोडा हलका झाला.
त्याच सुमारास आम्ही एक छोटा प्रवास ठरवला.
मिरजेत घरासमोर कित्येक वर्षें राहणाऱ्या शाराक्का जोशी यांच्या मुलीकडे — शोभाकडे — जायचे ठरले. त्या वेळी ती अलमट्टी (नदी पात्र आणि प्रचंड वाहतुकीचा पूल आणि रेल्वे चा पूल तिच्या घरातून दिसत असे) येथे राहत होती. तिचे यजमान रेल्वेत इंजिनियर होते आणि त्यांची तिथे बदली झाली होती. त्यांना दोन लहान आणि अतिशय व्रात्य मुले होती.
आमचा साधा प्लॅन होता — शोभाकडे मुक्काम करायचा आणि आसपासचा परिसर पाहायचा. त्यात विजापूर, बदामी, बनशंकरी आणि इतर काही ठिकाणे अशी स्थळे होती. तिचे यजमान रेल्वेत असल्यामुळे प्रवास सोपा जाईल असे आम्हाला वाटले.
पण इतिहासाला कदाचित दुसरेच काही ठरवायचे होते.
८ मे १९७४ रोजी भारतव्यापी रेल्वे संप सुरू झाला. त्याचे नेतृत्व George Fernandes करत होते. तो रेल्वे संप स्वतंत्र भारतातील सर्वात मोठ्या औद्योगिक संपांपैकी एक मानला जातो.
संप इतका कडकडीत होता की देशभरचे रेल्वे जाळे अक्षरशः ठप्प झाले. आणि आमचे सगळे प्लॅन उध्वस्त झाले.
विजापूर आम्हाला मिरजेहून शोभाच्या घरी जातानाच वाटेत थांबून एका सकाळीत घाईघाईने पाहावे लागले. तिथून अंधार झाल्यावर आम्ही विजापूर–बागलकोट बसने अलमट्टी जवळ उतरून तिचे घर शोधत गेलो. ते सुद्धा एक त्याकाळी साहस वाटले.
एक दिवस बदामी आणि बनशंकरी पाहिले खरे. पण बसला एवढी गर्दी होती की प्रवास म्हणजे शिक्षा वाटत होता.
त्या दिवसांत कर्नाटकात आमचा प्रवास होत नव्हता; आम्ही फक्त पुढे ढकलले जात होतो.
त्याशिवाय आम्ही कुठेही जाऊ शकलो नाही.
परत निघायच्या एक-दोन दिवस आधी शोभाच्या मोठ्या मुलाला डायरिया झाला. त्याला बागलकोटला आणून सलाईन लावावी लागली. त्या गोंधळात आता कधी एकदा मिरजेला परत जातो असे आम्हाला झाले होते.
पण परत येणेही सोपे नव्हते.
बसला इतकी गर्दी होती की आत घुसणेही अवघड होते. शेवटी कशीबशी बागलकोट–कोल्हापूर बस आम्ही पकडली. मी लहान आणि बारीक असल्यामुळे आधी आत शिरलो आणि तीन जणांची सीट पकडली.
त्या क्षणी मला प्रचंड समाधान वाटले. एवढ्या गर्दीत आमच्या पाच जणांच्या कुटुंबाला बसायला जागा मिळाली होती — आणि ती मी मिळवली होती.
पण त्या सीटवर कुशन नव्हते.
थोड्या वेळाने लक्षात आले की ती सीट इतकी सहज मिळाली त्याचे कारणच ते होते — त्या सीटवर कुशन नव्हते म्हणून कोणी तिथे बसायला तयार नव्हते.
त्या गोंधळात , त्या सीटवर बसता बसता माझी खूप ठेवणीतील चांगली हाफपॅण्ट फाटली.
सुदैवाने आम्ही एका छोट्या बोचक्यात काही तांदूळ आणि पोहे घेतले होते. तेव्हा कर्नाटकातून महाराष्ट्रात तांदूळ किंवा पोहे आणण्यावर बंदी होती. (विश्वास बसतोय?)
तेच बोचके आम्ही सीटवर कुशनसारखे ठेवले — त्यामुळे बसणे थोडे सोपे झाले. आणि राज्य सीमेवर तपासणी झाली तेव्हा ते बोचके आमच्या खाली असल्यामुळे इन्स्पेक्टरच्या नजरेतही आले नाही.
नंतर अनेक वर्षांनी पुन्हा बदामीला गेलो तेव्हा त्या गुहा, शेषशायी विष्णूची मूर्ती आणि इतर पट्टडकल वगैरे स्थळातील शिल्पे जास्त वेळ देऊन नीट पाहता आली. तेव्हा लक्षात आले की आपण १९७४ मध्ये काय पाहिले होते — आणि काय पाहणे राहून गेले होते.
पण त्या पहिल्या बदामी प्रवासाची आठवण अजूनही वेगळीच आहे.
मोठ्या ऐतिहासिक घटना त्या काळात घडत होत्या — युद्ध, महागाई, रेल्वे संप.
पण त्या प्रवासाची आठवण काढली की माझ्या डोळ्यासमोर येतात — बसची गर्दी, तांदळाचे बोचके, आणि एका सीट मिळाल्याचा छोटा विजय.
कदाचित जीवन असेच असते — मोठ्या घटनांच्या सावलीत, लहान आनंद शोधत पुढे जाणारे.
त्या काळात आमची स्वप्नेही फार मोठी नव्हती. कधी कधी जेवताना वडील दोन लाख रुपयांची लॉटरी लागली तर काय करायचे याची कल्पना मांडत. आजच्या काळात ती रक्कम लहान वाटेल; पण त्या वेळी ती आमच्यासाठी मोठे भविष्य होते. कदाचित म्हणूनच १९७० च्या दशकाच्या माझ्या आठवणीत मोठ्या ऐतिहासिक घटना कमी दिसतात — आणि जास्त आठवतात बागलकोटचे बसस्थानक, तांदळाचे बोचके, आणि एका सीट मिळाल्याचा छोटा विजय.
मे १९७४. रेल्वे संपामुळे देश ठप्प झाला होता. आमच्यासाठी इतिहास त्या दिवशी बागलकोटच्या बसस्थानकावर उभा होता.
These reflections are mine; AI was used as a thinking and editing aid.
हे विचार माझे आहेत; विचारप्रक्रिया आणि मांडणीसाठी AIची मदत घेतली आहे.

No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.