१९७१ वर्षी भारताने क्रिकेटमध्ये दोन ऐतिहासिक विजय मिळवले ... त्या नंतर त्या दशकात फारसे काही चांगले झाले नाही ...
दशकाच्या सुरवातीलाच पाकिस्तान बरोबर युद्ध झाले , पूर्व बंगालातून आधी आणि नंतर लोंढेच्या लोंढे भारतात आले, त्यासाठी टपाल दराची वाढ करण्यात आली , शरणार्थी कर...
बांगलादेश स्वतंत्र झाला, त्याचे २०२४ साली काय झाले पाहतोच आहोत... माझे पक्के काँग्रेसी वडील म्हणाले होते - हा नवीन देश एक दिवस भारताला पाकिस्तान पेक्षा जास्त त्रासदायक होईल ... थोडक्यात १९७१ चा माझा आनंद आता विरला आहे ....
भारतीय शहरातील महागाई , बजबजपुरी प्रचंड वाढली होती ... किती बांगलादेशी त्या आधीच्या वर्षांत आणि नंतर भारतात आले कुणास ठाऊक?
आमच्या कडे स्वैपाकाचा गॅस नव्हता: एक चूल , एक शेगडी, एक वातीचा स्टोव्ह, एक आवाजाचा स्टोव्ह होता, बंब नव्हता ... आईची खूप तारांबळ होत असे ... आणि त्यात एक दिवशी सरकारने सांगितले कोळसा घरच्या वापरासाठी मिळणार नाही...केरोसीन चे प्रचंड शॉर्टेज असे, ते जवळ जवळ मिळेनासे झाले ... आम्ही त्याच्या शोधात वणवण फिरत असू ...
सगळे लोक रेशन वर अवलंबून होते कारण खुल्या बाजारातील किमती प्रचंड होत्या...कपडे सुद्धा प्रचंड महाग होते, अनेक लोक तोच ड्रेस कित्येक दिवस घालत असत...आजूबाजूला गरिबी इतकी होती की ती मुले दिवाळीच्या पणतीचे गोडेतेल स्वैपाकासाठी पळवून घेऊन जात असत , दिवसातून दोन वेळा जेवण तरी मिळत होते का हा प्रश्न आहे...
१९७२ साली महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला , जवळच्या गावातले काही लहान शेतकरी, त्यांच्या स्त्रिया भीक मागत आमच्या दारावर येत ... चोऱ्यामाऱ्या प्रचंड वाढल्या ... रात्री लोक झोपली असताना घरात घुसून चोरी होत असे ... एकदा चोराचे जखमेतून गळणारे रक्त झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर आढळले... '
मिरजेत ह्या दशकातील पहिल्या काही वर्षांत सगळीकडे हागीनदारी असे, आमच्या शाळेच्या ग्राऊंडचा वापर सुद्धा त्यासाठी होऊ लागला होता, आमच्या जवळपासच्या बहुतेक लोकांना शौचालयासाठी साधारण अर्धा किलोमीटर हातात तपेली घेऊन जायला लागत असे...
मला सुद्धा प्राथमिक शाळेत जाताना पावसाळ्यात काही ठिकाणी पाय जपून ठेवावा लागत असे ...आमचे संडास त्या दशकातील काही वर्षे टोपलीचे होते...
१९७४ साली रेल्वे चा मोठा देशव्यापी संप झाला, त्या वर्षी कर्नाटकातून महाराष्ट्रात सामान्य माणसाला एक किलो सुद्धा तांदूळ उघडपणे आणता येत नसे, आम्ही तो लपवून आणला होता म्हणून हे मला माहित आहे, १९७५ साली आणीबाणी आली ...
माझी शाळा १९७१ पर्यंत एक उत्कृष्ट शाळा होती, ती संस्थेकडून काढून घेऊन नगरपालिकेला देण्यात आली, एक-दोन वर्षांत तिची संपूर्ण वाट लागली, माझ्या दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम सुद्धा १९७४-७५ साली शिकवण्यात आला नाही, हुषार मुलांचा सुद्धा तेजोभंग झाला, त्यांचे पुढचे आयुष्य त्याने झाकोळून गेले...
बेकारी, प्रचंड महागाई, भ्रष्टाचार, जातीयता, आणीबाणी ह्या सगळ्यामुळे समाजाचे कंबरडे मोडले गेले ..
बँकेतील क्लार्क चा जॉब हा भारतात सगळ्यात चांगला जॉब, असे त्या दशकात समजण्यात येई, माझ्या बरोबरीच्या अनेक मुलींनी कारकूनांशी लग्ने मोठया आनंदाने केली....
मेरे अपने , १९७१ हा सिनेमा त्या दशकातील भारत बऱ्यापैकी प्रामाणिक पणे दाखवतो...
No comments:
Post a Comment
Welcome!
If your comment (In Marathi, Hindi or English) is NOT interesting or NOT relevant or abusive, I will NOT publish it.
Comment may get published but not replied to.
If you are pointing out a mistake in the post and if I agree with your claim, I will change the post and acknowledge your contribution.
Only if you agree to this, post your comment.