Sunday, August 09, 2020

वाल्मिकी, चिं वि वैद्य आणि दुर्गाबाई- निसर्ग आणि पर्यावरण...Valmiki, C V Vaidya and Durgabai

दुर्गाबाई ह्या भारतीय अभिजात लेखकांच्या परंपरेतील एक महत्वाचे नाव आहे.

आपण जाणतो की निसर्ग हा त्यांच्या किती जिव्हाळ्याचा विषय होता- आणि साहजिकच तो त्यांच्या लेखनात वारंवार येतो.

रामायणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यातील निसर्ग/ पर्यावरण वर्णने.

भारताचार्य चिं वि वैद्य यांनी "रामायण कथासार", १९११ हे एक पुस्तक लिहले. त्याचे मला वाटलेले वैशिष्ट्य म्हणजे वैद्यांनी निसर्गवर्णनांकडे अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. आपण जी बहुतेक मराठी-हिंदीतील रामायणे (त्यात चांदोबा, अमर चित्र कथा, दूरदर्शन आले) वाचतो किंवा (आश्चर्य म्हणजे) टिव्ही किंवा सिनेमात पाहतो ती कथेवर फोकस असतात.

सोबतचा थोडा मोठा परिच्छेद, अरण्यकांडातील (पृष्ठ १११-११२) पहा.

निसर्ग नुसता ओसंडून वाहतोय: हिवाळा, धान्य, गवत, सूर्य, कुंकू न लावलेली स्त्री, दक्षिणोत्तर, चंद्र, हिम, तुषार, हत्ती आणि त्यांच्या सोंडा , हंस, कारण्डव, शिपाई, युद्ध, सारस, डोंगर, डोंगरमाथा , सरोवर, कमळ, पाने, जीर्णत्व , गोदावरी, शरयू, नदीस्नान...

(राम, सीता , लक्ष्मण आताच्या नाशिकमध्ये [पंचवटी] राहायला आल्यावरचे ते वर्णन आहे. मी स्वत: नाशिकला दोन वर्षे राहिलो आहे आणि माझे वडील १९७४ पासून आणि नंतर आई १९८५ पासून त्या दोघांच्या मृत्यपर्यंत नाशिकमध्येच होते. हिवाळ्यातील नाशिक ची थंडी आणि ऊन मी ओळखतो. दुर्दैवाने २०२० साली पर्यावरणाबद्दल जास्त बोलू नये हे बरे पण १९८७-८९ मध्ये मी वाल्मिकींचे नाशिक किंचित चाखले आहे!)

  सोबतचा परिच्छेद संपताच तिथे शूर्पणखा येते!

 कृतज्ञता: चिं वि वैद्य यांच्या साहित्याचे कॉपीराईट होल्डर्स आणि वरदा प्रकाशन, पुणे